राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सतत महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना पाटील यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दलच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. ‘बाळासाहेबांवर माझं प्रेम आहे. हे प्रेम राजकीय किंवा बेगडी नाही. शिवसेना-भाजप एकत्र यावेत या इच्छेतून मी बाळासाहेबांवर प्रेम करतो असे नाही.’ असेही ते म्हणाले आहेत.
बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘बाळासाहेबांची शिवसेना आणि आताची शिवसेना यात जमीन आस्मानाचा फरक आहे. बाळासाहेब असताना आम्हाला कशाचीच भीती नव्हती. त्यामुळेच बाळासाहेबांवरील माझं प्रेम हे राजकीय नसून त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेपोटी असल्याची भावनाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.
त्यांनी बाळासाहेबांबद्दल एक अनुभव सांगितला आहे. ते म्हणाले, ‘मी मुंबईमध्ये राहतो. माझ्या मुंबईच्या घराच्या चारही बाजूने मुस्लिम वस्ती होती. त्यामुळे जेव्हा दंगली व्हायच्या तेव्हा भीतीची परिस्थिती असे. मात्र, त्याकाळची शिवसेना आम्हाला पंधरा- पंधरा दिवस स्थलांतरीत करायची. बाळासाहेब असताना आम्हाला कशाचीही भीती नव्हती.’ असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.