आकोल्यात भारतीय बौद्ध महासभेने घेतलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली होती. अकोला क्रिकेट क्लबवरील मैदानावर हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम पार पडला. पाऊस असतानाही लोकांनी सभेला चांगलीच गर्दी केली होती. यावेळी ते या कार्यक्रमात बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, दाडू इंदुरीकरांच्या ‘गाढवाचे लग्न’ हे नाटक बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिल्यानंतर त्यांचा मोठेपणा दिसून आला होता. राजकीय वैर न ठेवता मनाचा मोठेपणा जसा बाळासाहेब ठाकरेंमध्ये होता, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांमध्ये नाही, अशी टीका यावेळी प्रकाश आंबेडकरांनी केली.
देवेंद्र फडणवीसांचे डिमोशन झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ते उद्या अकोल्यात येत आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच ग्रामपंचायत निवडणुका बहुजन वंचित आघाडी लढणार आहे अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. कार्यकर्त्यांनी या निवडणुका ताकदीने लढवायच्या. एकमेकांच्या उरावर बसायचे असेल तर खुशाल बसा. आरेला कारे करण्याची तयारी ठेवा, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.