राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सतत विरोधक महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसून येत आहे. तसेच या टीकेला आघाडीचे नेते सडेतोड उत्तर देताना दिसून आले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांवर करण्यात येणाऱ्या टीकेला शिवसेना भाजपला त्याच भाषेत प्रत्युत्तर देताना दिसत आहे. यातच आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी बाळासाहेब ठाकरे ठामपणे पाठीशी उभे राहिले नसते, तर मोदींचे अस्तित्वच संपले असते, अशी टीका केली आहे.
चिपळूण सावर्डे विभागीय शिवसेना मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. मराठी माणसाला संपविण्यासाठीच हे मोठे षडयंत्र भाजपने आखले आहे, असा मोठा आरोप जाधव यांनी यावेळी केला. भाजप खालच्या पातळीवर जाऊन, मर्यादा सोडून टीका करत आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.
भाजपचा मुंबई महानगरपालिकेतून मराठी माणसाला बाहेर काढायचे असा मोठा डाव आहे. गुजरात दंगलीवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे राहिले म्हणूनच आता मोदी पंतप्रधान आहेत, हे विसरू नका. अन्यथा मोदी यांचे अस्तित्वच संपले असते, हेही लक्षात ठेवा, अशी टीका भास्कर जाधव यांनी यावेळी बोलताना केली.