मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना महापालिका निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर यावर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी सेनेला टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना महापालिका निवडणूक लढवणार असेल तर त्यांना शुभेच्छा. कारण त्यांच्यामुळे भाजपसाठी निवडणूक सोपी जाईल असे त्यांनी म्हंटले आहे.
रापुढे ते म्हणाले की “बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुणी संपवली असेल तर ती या नाइटलाइफवाल्यांनी संपवली आहे. शिवसेनेत आता सगळे जुने शिवसैनिक मागे पडले आहेत. गेल्या दोन वर्षांत जुने शिवसैनिक कुठेच दिसत नाहीत. जुन्या शिवसैनिकांचा भाजपला पूर्ण पाठिंबा आहे. ही बाळासाहेबांची हिंदुत्ववादी शिवसेना राहिली नाही,” असं विधान नितेश यांनी केलं.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांची जबाबदारी नारायण राणेंवर देण्यात येणार का, या प्रश्नाचं उत्तर देताना नितेश यांनी म्हटलं की,”नारायण राणे यांना मुंबई महापालिकेची धुरा दिल्याची अद्याप अधिकृत माहिती नाही, पण नारायण राणे आशिष शेलार, लोढा यांच्यासोबत उभे राहिले तर मुंबई महापालिकेतील बेजबाबदार कारभाराला पर्याय देता येईल.”