मुंबई | शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रखडला असल्याने, इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. तर अनेकांकडून उघडपणे याबाबत बोलले जात आहे. दरम्यान माजी मंत्री बच्चू कडू यांनी देखील पुन्हा एकदा मंत्रिपदाची अपेक्षा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. मंत्रिपदासाठी अपेक्षा कायम असून दिव्यांग मंत्रालय मिळाल्यास मलमपट्टी अधिक जोमाने करता येईल, असे बच्चू कडू म्हणाले आहे.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीनिमित्ताने प्रहार व मेस्टाचे उमेदवार डॉ. संजय तायडे पाटील यांच्या प्रचारासाठी बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीवर निशाणा साधला होता.
यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, दिव्यांग मंत्रालयाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षापासून बोलत होतो, परंतु मंत्रालय झाले नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या सहा महिन्यात मंत्रालय स्थापन केले, दिव्यांग मंत्रालयासाठी 20 वर्षापासून संघर्ष केला. अनेक गुन्हे दाखल झालेत. दिव्यांग मंत्रालय झाले याच आनंदात मंत्रीपद विसरलो मात्र, अपेक्षा कायम असून दिव्यांग मंत्रालय मिळाल्यास मलमपट्टी अधिक जोमाने करता येईल, असे मत माजी मंत्री प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चु कडू यांनी व्यक्त केले.