शिवसेनेतून बंडखोरी करत 40 आमदारांसह 10 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठींबा देत सत्ता स्थापन केली. यानंतर काही दिवसांनी मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला.यामध्ये अपक्षांना संधी दिली जाईल असे बोलले जात होते परंतु बंच्चु कडू यांच्यासह कोणत्याही अपक्षाला संधी न मिळाल्याने नाराजीचा सूर दिसून आला. यामध्ये दोन आमदारांचा पाठींबा असलेले बच्चू कडू यांनी तर जाहीर नाराजी व्यक्त केली. यावर त्यांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे. बच्चू कडू यांनी सबुरीने घ्यावे ते लवकरच मंत्रीपदावर असतील असे सूचक वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
केसरकर म्हणाले की, बच्चू कडू हे जेष्ठ नेते असून, त्यांच्याबरोबर दोन आमदार आहेत. अन्य आमदारांच्यावतीने ते बोलत असतील तर, मला त्यातील वस्तुस्थिती माहिती नाही. लवकरच ते मंत्रीपदी दिसतील, अशी आमची अपेक्षा आहे. जे व्यक्ती मंत्री होणार आहेत, त्यांनी थोड संयम ठेवायला हवा, असे दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
अशातच मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेला बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खोक्यांचा आरोप केला होता. या आरोपांवर बच्चू कडूंनी पलटवार केला आहे. 50 आमदारांना खोके दिले का? हे आता शिंदे-फडणवीस यांनीच स्पष्ट करावे, असं प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी दिलं आहे.
‘महाराष्ट्राच्या विकासाची खुंटकेली गती वाढवण्यासाठी आणि जनादेशाचा आदर करुन राज्यातील 50 आमदारांनी स्वतः हून एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी तर मंत्री असूनही त्याचा त्याग केला आणि शिंदेना समर्थन दिले. त्यावेळेपासून ठाकरे गटाकडून या 50 आमदारांवर खोके घेतल्याचे आरोप होत आहेत,’ असं बच्चू कडू म्हणाले.