शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्ष आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडसत्रावर जोरदार टीका केली. शिवसेना भवनात बोलताना संजय राऊत यांनी सध्या महाराष्ट्रात आयटीची भानामती सुरू असल्याचे म्हटले. राज्य सरकारमधील १४ प्रमुख लोकांवर कारवाया केल्या जात आहेत. भाजपा नेत्यांवर धाडी पडत नाहीत.
ते मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागतायेत का? आयटी विभागाची भानामती कोण करतंय त्याचा मोठा खुलासा शिवसेना करेल. सुमीत नरवर दुध विकणारा व्यक्ती ४-५ वर्षात त्याची मालमत्ता ८ हजार कोटींवर गेली. मलबार हिल परिसरात त्याचं अलिशान घर आहे. ईडीने जो चष्मा लावला आहे त्यातून या लोकांकडे पाहावं. इतक्या कमी वर्षात एवढी संपत्ती कशी आली? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील कुठल्या भाजपा नेत्याची बेनामी संपत्ती त्याच्याकडे आहे. त्या नेत्याच नाव समोर आणणार आहे. पहिली ही नावं पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगणार मग पुढे माध्यमांसमोर आणणार आहे. ट्रायडेंट ग्रुपला कोणी काम दिली? आम्ही सर्व नावं उघड करणार त्यानंतर आमच्यावर जी चौकशी लावायची ती लावा, आम्हाला अटक होणार असेल तर खुशाल करा असा इशारा राऊतांनी दिला आहे.