मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यामागे एका राजकीय नेत्याचा दबाव आहे, असे विधान आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर पालकमंत्री अनिल परब यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ते एका पोलीस अधिकाऱ्याला बळाचा वापर करून अटक करण्याची सूचना देत आहेत. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मंगळवारी रत्नागिरीत जिल्हा नियोजन समितीची सभा होती. त्या सभेनंतर पत्रकार परिषद सुरू होण्याआधी पालकमंत्री अनिल परब यांचे दोन फोनवर संभाषण झाले. तो व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. तसेच या वायरल व्हिडिओ संदर्भात वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा भाष्य केले आहे. अनिल परबांना विचारून अटक करतायत कोण आहेत ते ? असा प्रश्न सुद्धा पाटील यांनी उपस्थित केला होता.
नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याबाहेर युवासेनेने एकत्र येत आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी युवा सैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राणेसमर्थक आणि युवासैनिक समोरासमोर आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने – सामने आले व दगडफेकही झाली. यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात कसे सहकारी निवडले आहेत याची छोटीशी चुणूक राणेंच्या वक्तव्यावरुन देशाला व महाराष्ट्राला मिळालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाचा वैयक्तिक राग असेल, पण त्यांच्याबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे महाराष्ट्र कधीच मान्य करणार नाही असे विधान सुद्धा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते.