राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक नेत्यांना आता पर्यंत ईडीने नोटीस बजावली आहे. त्यात परिवहन मंत्री अनिल परब यांना सुद्धा ईडीने कार्यालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र त्यांनी १४ दिवसाचा अवधी मागितला होता. त्यातच भाजप नेते करीत सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्यावर जोरदार गंभीर आरोप लगावला होता.
परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोलीतील दोन रिसॉर्ट अनिधिकृत आहेत. त्यापैकी एकावर कारवाई करण्याचे आणि परब यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, परब मंत्री असल्याने त्यावर कारवाई होत नाही, असा आरोप करतानाच परब यांची आज ना उद्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी तर होणारच आहे. पण त्यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी गुन्हेही दाखल होणार आहेत. त्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला.
संचयनी ग्रुपकडून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध घोटाळ्यांवर भाष्य केलं. याच पत्रकार परिषदेत त्यांनी अनिल परब यांच्या दोन रिसॉर्टवरूनही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिंडळातील मंत्री अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. त्याची चौकशी झाली आहे. त्यावर कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. त्यातील एका रिसोर्टचं नाव साई रिसोर्ट अॅनेक्स असं आहे. तर दुसऱ्याचं नाव सी-कॉन्च रिसोर्ट असं असून हा रिसॉर्ट आपल्या मालकीचा असल्याचं लपवण्याचा परब यांचा प्रयत्न आहे. हे दोन्ही रिसोर्ट अनधिकृत असल्याचं केंद्राच्या टीमने राज्य सरकारने सांगितलं होतं. दोन्ही रिसोर्टमध्ये सीआरझेडचा भंग झाला आहे. पण सरकारने केवळ साई रिसोर्ट तोडण्याचा आदेश दिला आहे. दुसरा रिसोर्ट वाचवण्याचं पाप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे. पण आम्ही या रिसोर्टवर कारवाई करायला लावूच, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.