दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे राज्याच्या राजकारणातही पडसाद उमटत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आंदोलनासंदर्भात ट्विट करण्यात आल्यानंतर देशातील सेलिब्रिटींनी ट्विट करत भाष्य केले होते. सेलिब्रिटींनी मोदी सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केल्याचा सूर सोशल माध्यमांवर उमटला. काही जणांच्या ट्विटमध्ये साधर्म्य असल्याचं सांगत काँग्रेसने ट्विट प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी करण्यात येईल अशी माहिती दिली होती.
पुढे भाजपच्या टीकेला उत्तर देताना देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युतरामागे भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रवृत्त केले होते का? व भाजपाचा त्यांच्यावर कोणता दबाव होता का? देशपातळीवरती अनेक संवैधानिक संस्था, विरोधी पक्षांची सरकारे व मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींवर मोदी सरकारचा प्रचंड मोठा विरोध असताना या राष्ट्रीय हिरोंच्या मागे देखील भाजपाचा दबाव असल्याचे नाकारता येत नाही.
तसेच या संपूर्ण ट्विटची भाजपा कनेक्शनची चौकशी व्हावी अशी मागणी सचिन सावंत यांनी देशमुख यांच्याकडे केली. यावेळी देशमुख यांनी या विषयावर नियमांनुसार कारवाई करण्याचे आश्वासन सावंत यांना दिले. या पार्श्वभूमीवर भाजपनं आघाडी सरकारवर टीका केली होती. या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत. पण त्यांच्यावर कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का? त्या नेत्याची चौकशीची मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे, असं अनिल देशमुखांनी स्पष्ट केलं आहे.