अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनानंतर भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. परंतु या सर्व घटनाक्रमावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.
“अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुश्मनांना बसला आहे. पुढे पुढे पाहा. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहेत. शिवसेनेचे लाखो अग्निवीर पेटलेल्या मशालीची पहिली विजयपताका घेऊन आता आणखी त्वेषाने बाहेर पडतील,” असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
अंधेरीचा पहिला चटका…मशाल पेटली! या मथळ्याअंतर्गत प्रकाशित झालेल्या सामनाच्या अग्रलेखात अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांवर सडकून टीका करण्यात आली आहे. “आधी एक ना अनेक कारस्थाने आणि नंतर बराच ऊहापोह केल्यावर भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी आता अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी श्री. शरद पवारांपासून राज ठाकरे यांनी फडणवीसांना विनम्र आवाहन केले व शेवटी भाजप नेत्यांनी म्हणे दिल्लीशी चर्चा करुन अंधेरीतील उमेदवार मागे घेतला.
याचा अर्थात भाजपचे माघारी नाट्य हे दिसते तसे सरळ नाही. पराभव झाला तर सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल हे त्यांच्या लक्षात आले असावे आणि शिवसेनेची मशाल जिंकणारच आहे याची खात्री भाजपला पटली असावी. शिवसेनेची ही ‘भडकलेली मशाल’ बेइमानीचे इमले जाळून टाकेल. त्यापेक्षा आता माघार घ्यावी हेच बरे, हा सुज्ञ विचार भाजप व मिंधे सरकारने केलेला दिसतो,” असं अग्रलेखात पुढे लिहिलं आहे.
निवडणुकीतून माघार घेतल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भाजपचे आभार मानतानाच जहरी टीका देखील केली आहे. “शिवसेना हा अस्सल मराठीं बाण्याचा प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि हिंदुत्वात पवित्र अग्निदेवतेचे विशेष स्थान आहे. यज्ञ, होमकुंडातील धगधगत्या अग्नीत समिधांची आहुती देऊन धर्मावरील, समाजावरील संकट दूर केले जाते. अंधेरीत तेच घडले. शिवसेनेच्या विजयी मशालीने या पोटनिवडणुकीतील संकटे व अमंगलाचा नाश केला.
भाजप. कारस्थानी आनंदीबाई. माफ करा, कमळाबाईंनी बेइमान ‘मिंधे’ गटास हाताशी पकडून जो घाव शिवसेनेवर, पर्यायाने महाराष्ट्रावर घातला, त्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी नियतीनेच जणू अंधेरी पोटनिवडणुकीचे प्रयोजन केले होते. आधी ऐटीत बेटकुळ्या फुगवून शड्डू ठोकणाऱ्यांना कुस्तीआधीच मशालीची धग आणि चटके बसले व त्यांनी कुस्ती न खेळताच मैदान सोडले. अब्रू वाचावी म्हणून ‘झाकली मूठ.’ बंदच ठेवण्याचा भाजपायी मंडळींचा माघारीचा निर्णय हा महाराष्ट्रात एका त्वेषाने पेटलेल्या शिवसेनेच्या ज्वालाग्राही मशालीचा पहिला विजय आहे.”