तब्बल चार वर्षांनंतर आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नंतर आमिरने पुढचा चित्रपट प्रदर्शित करण्यास बराच अवधी घेतला. प्रेक्षकांना त्याच्या या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता होती. मात्र बॉक्स ऑफिसवर ‘लाल सिंग चड्ढा’ला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आता आमिरचा पुढचा कोणता प्रोजेक्ट असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं.
अखेर आपल्या करिअरबाबत आमिरने मोठा आणि तितकाच धक्कादायक निर्णय घेतला आहे. दिल्लीतल्या एका कार्यक्रमात त्याने आपला हा निर्णय जाहीर केला. त्याचसोबत त्यामागची महत्त्वाची भूमिकाही मांडली.आमिर खान पुढील दीड वर्ष अभिनयातून ब्रेक घेणार आहे. जवळपास 18 महिने तो रुपेरी पडद्यापासून लांब राहणार आहे. आमिरचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. मात्र असा निर्णय घेण्यामागचं कारणही त्याने स्पष्ट केलं आहे.
कामातून काही काळ ब्रेक घेऊन कुटुंबीयांना तो वेळ देणार असल्याचं आमिरने सांगितलं. “जेव्हा मी अभिनेता म्हणून चित्रपटात काम करतो, तेव्हा त्या कामात मी पूर्णपणे व्यग्र होऊन जातो. माझ्या जीवनात दुसरं काहीच उरत नाही. याच कारणामुळे मी ब्रेक घेतोय. मला माझ्या कुटुंबीयांसोबत राहायचंय. माझी आई, माझ्या मुलांसोबत वेळ घालवायचा आहे. गेल्या 35 वर्षांपासून मी फक्त कामच करतोय. मी फक्त माझ्या कामाकडेच पूर्ण लक्ष देतोय आणि जे लोक माझ्या जवळचे आहेत, त्यांच्यासाठी ही बाब योग्य नाही”, असं तो म्हणाला.