दापोली येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेत शिवसेनेचे बंडखोर आमदार योगेश कदम यांच्यावर टीका करण्यात आली होती. या टीकेला रविवारी दापोलीत एकनाथ शिंदे गटाच्या भव्य मेळाव्यात आमदार योगेश कदम यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे तसेच केलेल्या आरोपांना सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.
‘जेव्हा कोकण संकटात होते, वादळाने हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली होती, त्यावेळी मी आदित्य ठाकरे यांना फोन केला होता. आपण ही परिस्थिती बघा आणि तातडीने मदत करा, असं त्यांना सांगितलं. मात्र ते आले नाहीत. या आमदार योगेश कदमने १७ हजार कुटुंबांपर्यंत धान्य वाटप केले, सगळीकडे जाऊन पाहणी केली,’ असं म्हणत कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे.
‘कोकणातील शिवसेना संपवण्याचा आणि कुणबी समाजात फूट पडण्याचा राष्ट्रवादीचा मोठा डाव होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही मी हा डाव ओळखा, असं सांगितलं. पण त्यांनी काहीही केलं नाही. दापोली नगरपंचायत निवडणुकीत अनिल परब यांनी इथे येऊन ढवळाढवळ केली आणि राष्ट्रवादीला बळ दिलं. साहेब तुम्हाला योगेश कदम नको होता तर तसं सांगायचं, मी दिला असता राजीनामा, पण शिवसैनिकांवर अन्याय कशासाठी केला?’ असा सवाल आमदार योगेश कदम यांनी केला आहे.