नवी दिल्ली | २२ हजार ८४२ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याबद्दल सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकरणांवरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत या प्रकरणातून अंग काढण्याचा प्रयत्न केला आहे.
यूपीए सरकारच्या कालखंडात एबीजीची सर्व बँक खाती एनपीएमध्ये वर्ग करण्यात आली. बँकांनी वेळेपूर्वीच घोटाळा उघड केल्याने एबीजीवर कारवाई सुरू करण्यात आली. अन्यथा अशा प्रकारचे घोटाळे समोर येण्यासाठी ५२-५६ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाते, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. याशिवाय, हे प्रकरण आता उचलून धरून विरोधक आपल्याच पायावर कुऱ्हाड चालवत असल्याचा टोला सीतारामन यांनी लगावला आहे.
यापूर्वी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली आहे. मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक झालेली आहे. ७५ वर्षांमध्ये भारतीय जनतेच्या पैशाची एवढी फसवणूक झालेली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी ‘अच्छे दिन’ आहेत, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली.