राज्यात आज दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच निर्बंधांविना दहीहंडी साजरी होत आहे. त्यामुळे गोविंदांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळीतील जांभोरी मैदानानंतर मागाठाणे येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी फडणवीसांनी गोविंदांना संबोधित केलं.
आपलं सरकार आलं आणि दहीहंडी देखील जोरदार होतेय, आता कसं वाटतंय? मोकळं मोकळं वाटतंय ना?, अस फडणवीसांनी गोविंदांनाच विचारलं. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयामुळे तुम्ही आता गोविंदा राहिलेले नाही, तुम्हा आता खेळाडू झालेले आहेत, असं म्हटलं. त्यानंतर गोविंदांनी एकच जल्लोष केला.
“पाऊस सुरू होतोय आणि बघा आपलं सरकार आलं तर काय होतं? आपलं सरकार आलं तर दहीहंडी जोरदार, गणेशोत्सव जोरदार, नवरात्री जोरात आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, आता तुम्ही फक्त गोविंदा नाहीत. तुम्ही खेळाडू आहात. आता तुम्हाला खेळाडूचे सर्व लाभ दिले जाणार आहेत. या ठिकाणी कुणी जखमी होऊ नये, जर झाला, तर सरकार आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आता कसं वाटतंय? मोकळं मोकळं वाटतंय ना, छान छान वाटतंय ना”, असं फडणवीस म्हणाले.