राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी अत्युंत चुरशीची लढत झाली, यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत भाजपावर आरोप केले आहेत तसेच पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती. अखेर राज्यसभेच्या 6 जागांचा फायनल निकाल हाती लागला. महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झाला. यावर नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आरोप केलेत. ते म्हणाले, खरं तर चारही उमेदवार निवडून आणणं हे कठीण काम नव्हतं. ही निवडणूक गेम प्लॅनची होती. असा आरोप नाना पटोले यांनी भाजपावर केला आहे.
पुढे ते म्हणाले, या निवडणुकीसाठी पैशांचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर गेम प्लॅनचा भाग होता यामधून आम्हाला शिकण्याजोगे आहे. यातून आम्ही शिकून मोठी भरारी घेऊ, आत्ता आम्ही गेम प्लान मध्ये फेल झालो. यात देवेंद्र फडणवीसांचा विजय झाला आहे. पवारांच्या मनात काय हे माहित नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक जिंकली आहे. त्यांना हार्दिक शुभेच्छा.