भाजपसोबत जाऊन शिंदे गटाने सरकार स्थापन करून आता महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे दोन्ही गटामध्ये इच्छुकांची चलबिचल सुरू झाली आहे. या विस्तारात मनसेलाही संधी मिळणार अशी चर्चा रंगली आहे. पण, आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
आता या टीकेमुळे मनसे आणि शिंदे सरकारमध्ये काही तरी बिघडल्याची चर्चा रंगली आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करून शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘बंड झाले,आता थंड झाले ? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत,मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय,सर्वकाही ठप्प आहे’ अशी टीका राजू पाटील यांनी केली आहे.
तसंच, ‘तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी,रोगराई वाढत आहे. विशेष म्हणजे, शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीमध्ये मनसेनं शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केलं होतं. एवढंच नाहीतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतुकही केलं होतं. मध्यतंरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली होती. मात्र या टीकेमुळे शिंदे गट आणि मनसेत बिनसलं असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
बंड झाले,आता थंड झाले ?
पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत,मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय,सर्वकाही ठप्प आहे.
तुमचं सर्व ओक्के आहे हो,पण लोकांचे सण आलेत.रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी,रोगराई वाढत आहे.याकडे कोण बघेल ?@mieknathshinde
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 8, 2022