मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुरकल्यानंतर तसेच ४०आमदार फोडून दुसरा गट निर्माण केल्यानंतर महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर या पार्श्वभूमीवर मूळ शिवसेना पक्षाच्या भवितव्याविषयीच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण सध्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसैनिकांनी मुंबईतील गिरगावात लावलेलं पोस्टर चर्चेचा विषय ठरतंय. हे पोस्टर आहे उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरेंचं.आजची शांतता, उद्याचं वादळ… नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव ठाकरे या आशयाचं पोस्टर लावण्यात आलंय. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसैनिकांना आता तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील एण्ट्रीची प्रतीक्षा असल्याचं पोस्टरवरुन दिसतंय.
राज्याच्या राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री होण्याच्या चर्चा सुरू झाली आहेत. ‘तेजस ठाकरे यांना राजकीय मैदानात उतरवावे’ अशी मागणी युवासेनेनं उद्धव ठाकरेंकडे केली होती. युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियातही आपली ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आजवर जंगलात, दऱ्या खोऱ्यांमध्ये रमणारे तेजस ठाकरे राजकारणाच्या आखाड्यात शड्डू ठोकणार का हे पाहावं लागणार आहे.
ठाकरे आणि पवार या दोन घरांभोवती महाराष्ट्राचे राजकारण गेल्या पाच दशकांपासून केंद्रित आहे. पिढ्यानपिढ्या, राज्याच्या राजकारणाला या कुटुंबांकडून नवे चेहरे मिळत आले आहेत. आता यात एका नवीन नावाची चर्चा होत आहे, ती तेजस ठाकरे यांच्या नावाची. तेजस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा आहे. 7 ऑगस्ट रोजी सामना वृत्तपत्रात त्यांच्या फोटोसह जाहिरातीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आणि तेजस देखील राजकारणात प्रवेश करणार की नाही याविषयी चर्चा सुरू झाली.