महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला असून नवाब मलिकांच्या सुधारीत याचिकेवर सुनावणीस हायकोर्टानं नकार दिला आहे. त्यामुळे एकूणच राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याच्या नवाब मलिकांच्या अपेक्षांना सुरूंगच लागला आहे. त्यामुळे एकूणच राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याच्या नवाब मलिकांच्या अपेक्षांना सुरूंगच लागला आहे.
तसेच मलिकांची याचिका फेटाळल्यामुळे अनिल देशमुखांनाही राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटातील चिंता वाढली आहे. सकाळीच मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टाकडून कायम ठेवत नवाब मलिकांना राज्यसभा निवडणुकीची परवानगी नाकारली होती.
या याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी करत मलिकांनी पुन्हा नव्यानं याचिका केली होती. दुपारच्या सत्रात या याचिकेवर सुनावणी पार पडणार होती. पण सुधारीत याचिकेवर सुनावणीसाठीच हायकोर्टानं नकार दिल्यामुळे मलिकांच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही धुळीला मिळाल्या आहेत.
दरम्यान, न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी अनिल देशमुख यांच्या याचिकांवर सुनावणी करण्यास यापूर्वीच नकार दिला होता. त्यामुळे सकाळच्या सत्रात फक्त नवाब मलिकांच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. याच निकालावर अनिल देशमुखांचं मतदानाचं भवितव्य अवलंबून होतं. जर मलिकांना परवानगी मिळाली असती, तर हा निकाल घेऊन अनिल देशमुख अन्य न्यायमूर्तींपुढे दाद मागणार होते. पण नवाब मलिकांनाच परवानगी नाकारण्यात आल्यामुळे आता अनिल देशमुखांनाही मतदान करता येणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे.