धरणातून नीरा नदीत 22 हजार क्युसेक्स विसर्ग..
…निरा व भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा..
बेंबळे : शनिवार दिनांक 24 जुलै रोजी वीर धरणातून नीरा नदीत पाच दरवाजातून 22305 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला असल्यामुळे नीरा व भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वृत्तांत असा की सातारा आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे नीरा नदीला महापूर आलेला असून देवधर, गुंजवणी ,भाटघर व वीर या धरणातील पाणी साठा 70 ते 75 टक्के च्या पुढे गेलेला आहे. वीर धरणामध्ये सध्या 89 टक्के पाणीसाठा असल्यामुळे व भविष्यातील पूर परिस्थिती लक्षात घेऊन पाच गेटमधून 22305 क्युसेक्स पाणी नीरा नदीत सोडण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक अभियंता जयंत भांडवलकर यांनी दिली आहे.
निरेत सोडलेले हे पाणी नरसिंहपूर जवळ संगम येथे भीमा नदीत देऊन मिसळणार आहे .वीर ते नरसिंगपूर 31 ते 32 किलोमीटर अंतरासाठी किमान वीस-बावीस तास लागणार आहेत. त्यामुळे मध्यरात्रीनंतर केव्हाही भीमा नदीमधेही पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे.
नरसिंहपूर पासून पुढे भीमा नदीच्या पाणी प्रवाहात वाढ होणार असल्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.