मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडीने इतके केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले होते अशातच आजच्या सामना अग्रलेखातून केंद्रातील मोदी सरकार आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या केंद्रीय ताप यंत्रणेवर टीका करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे ‘ठाकरे’ सरकार अशा हवेतील तलवारबाजीने पडणार नाही. एका कॅबिनेट मंत्र्यास गुंतविण्यासाठी जे कपट घडवले, तो लोकशाहीचा खून आहे अशा शब्दात शिवसेनेने नवाब मलिकांच्या अटकेवर भाष्य केले आहे.
शिवसेनेने म्हटलंय की, नवाब मलिक हे ईडीच्या कार्यालयातून हसत हसत बेडरपणे बाहेर आले व मूठ आवळून त्यांनी नारा दिला, खोटेपणापुढे झुकणार नाही, लढत राहीन व जिंकेन! हिटलरच्या नाझी फौजांचा पराभव अटळ आहे. नाझी भस्मासुराचा जसा उदय झाला तसा अंतदेखील झाला हे सध्याच्या मस्तवाल राज्यकर्त्यांना लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते. केंद्रीय तपास यंत्रणा या नाझींच्या फौजांप्रमाणे सध्या काम करीत आहेत व आपल्या राजकीय मालकांचे बेकायदेशीर हुकूम मानीत आहेत. सत्य बोलणाऱ्यांचा गळा घोटणे ही मर्दानगी नव्हे असा टोला भाजपाला लगावण्यात आला आहे.
वाचा सामना अग्रलेखात मुद्द्ये
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या घरी गुरुवारी सकाळी ‘ईडी’ नामक ‘नाझी फौजा’ पोहोचल्या व २००३ सालच्या एका प्रकरणात त्यांना अटक केली. २००३ साली नवाब मलिक यांनी एक जमीन खरेदीचा व्यवहार केला. तो संबंध दाऊद इब्राहिमशी जोडून मलिक यांच्यावर मनी लॉण्डरिंगपासून गैरव्यवहार, टेरर फंडिंग असे अनेक गुन्हे दाखल केले आहेत.
२००३ च्या व्यवहारात २०१३ साली आलेला मनी लॉण्डरिंगचा कायदा लागू होत नाही. तरीही भाजपच्या नाझी फौजांनी नवाब मलिक यांना अटक केली व त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. मुंबईतील भाजपच्या काही लोकांनी रस्त्यावर येऊन तलवारी उपसल्या व धमक्यांची भाषणे केली.
हा जल्लोष बहुधा यासाठी असावा की, मोदी-शहा यांच्या मनमानीविरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या खोटेपणाचा रोज बुरखा फाडणाऱ्या नवाब मलिक यांचा आवाज नाझी फौजांनी दाबला आहे. भाजपविरुद्ध सत्य बोलणाऱ्यांना ईडी, सीबीआयच्या नाझी फौजा चिरडून टाकतील, असाच संदेश देण्यात आला आहे.