मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फाडायव्हस यांनी शपथ घेऊन 35 दिवस उलटले असले तरी राज्यात अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती दिली.
स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्यांच्या मुख्यालयावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण व्हावं आणि त्यासाठी याधीच मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, असा फडणवीस आणि शिंदे यांचा प्रयत्न आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, की येत्या काही दिवसांत सारे चित्र स्पष्ट होईल. मंत्रिमंडळाचा विस्तार 15 ऑगस्टपूर्वी होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यासोबतच गृहखातं भाजपकडेच राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मात्र, हे खातं कोण सांभाळणार याबद्दल त्यांनी काहीही माहिती उघड केली नाही. परंतु, गृहखातं आपल्याकडे राहणार का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.
‘मंत्रिमंडळाचा विस्ताराबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, लवकरच विस्तार होईल. मी त्याही पुढे जाऊन सांगतो, सर्वांनी विचारण्याआधीच आमच्या सरकाराचा मंत्रिमंडळ विस्तार होईल. सुप्रीम कोर्टाने कुठेही मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका, असं कुठेही म्हटलं नाही. त्यामुळे सुनावणी आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही संबंध नाही. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.