कोकणासह पश्चिम महाराष्ट्र पडणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. कोकणात पुराच्या पाण्यामुळे अनेकांचा संसार वाहून गेला आहे. याच पार्श्वभूमीवर आता अनेक संघात आणि राजकीय पक्ष मदतीसाठी सरसावले आहेत. या पूरग्रस्त कोकणवासीयांची सध्याची गरज ओळखून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 1 हजार सोलापूरी चादरी कोकणाला पाठवल्या आहेत.
सोलापूरातून 1 हजार चादरी कोकणला रवाना झाल्या आहेत. मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यावतीने या एक हजार सोलापुरी चादरींची मदत कोकणला देण्यात येत आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवघड परिस्थितीत सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं.
आत्ता लोकांचा जीव महत्वाचा आहे आणि नंतर जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोहोचेल असं पहावं. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी. महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये, असं राज ठाकरे म्हणालेत.