संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत
बार्शी तालुक्यातील शेंद्री येथे झाले जिल्ह्यात आगमन
वाटचालीतील 29 वा तर जिल्ह्यातील पहिला मुक्काम शेंद्रीत
गणेश भोळे/धीरज करळे
बार्शी:
कई आता देखेन माझा मायबाप l
घटिका बोले लेकी लेखी धरुनीया माप ll
याप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यासाठी विठ्ठल भेटीसाठी खानदेशातील मुक्ताईनगर येथून प्रस्थान ठेवलेला आदिशक्ती संत मुक्ताबाईचा पालखी सोहळा ऊन, वारा व पाऊस याची तमा न करता मजल दरमजल करीत विठ्ठल नामाच्या जयघोषात विठ्ठलाचे साम्राज्य असलेल्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला. जिल्ह्याच्या सीमेवर वारदवाडी फाटा (शेंद्री) तालुका बार्शी या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
जळगांव जिल्ह्यातील संत मुक्ताबाई समाधीस्थळ तीर्थक्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर येथून 6 जून रोजी संत मुक्ताबाईचा पालखी सोहळा पंढरपूरच्या मार्गाने मार्गस्थ झाला होता. वाटेमध्ये जळगांव, बुलढाणा, जालना, बीड, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यातील आंतर मार्गक्रमण करीत आज परंडा तालुक्यातील वाकडी येथून सोलापूर जिल्ह्यातील वारदवाडी फाटा येथून बार्शी तालुक्यात दाखल झाला. तालुका प्रशासनाच्यावतीने आमदार दिलीप सोपल, नायब तहसीलदार संजीवन मुंडे, पं.स.च्या सभापती कविता वाघमारे , जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत थोरात, लेबर फेडरेशन चे संचालक शंकर मांजरे, महेश यादव,शेंद्रीच्या सरपंच चंपाबाई मदने, उपसरपंच महेश चव्हाण, ग्रामसेवक विजय गावडे, मंडल अधिकारी शरद शिंदे,, तलाठी गवळी मॅडम यांनी पालखीचे जिल्ह्यात स्वागत केले.
.ह भ प रविंद्र महाराज हरणे पालखी सोहळा प्रमुख यांचा सत्कार करून मुक्ताई पालखीचे स्वागत केले
ह भ प नितीन महाराज करणे ,विशाल महाराज खोले ,सुधाकर पाटील, पुजारी विजय महाराज खवले सुधाकर पाटील ,किती लखन महाराज यांचा सोलापूर व तालुका प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्यानंतर सोहळा शेंद्रीकडे मुक्कामासाठी दाखल झाला.
यावर्षी पालखी सोहळ्यासोबत 1,500 वारकरी व 25 दिंड्या सहभागी झाल्या आहेत. यामध्ये रथाच्या पुढे 8 तर उर्वरित दिंड्या रथाच्या मागे मार्गक्रमण करीत आहेत. सोहळ्यासोबत संस्थांची 8 वाहने, रुग्णवाहिका व डॉक्टरांचे पथक सहभागी झालेले आहेत.
— चौकट —
यावर्षी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी तरुणांची संख्या जास्त आहे. याबरोबरच महिलाही मोठ्या प्रमाणात आहेत. वारीच्या वाटचालीतील शेंद्री येथील मुक्काम हा 29 वा तर सोलापूर जिल्ह्यातील पहिला मुक्काम आहे. या प्रवासादरम्यान सोहळ्याचे बीडमध्ये उभे तर वडीगोद्री येथे गोल रिंगण असे दोन रिंगण सोहळे पार पडले.
— चौकट —
सोहळ्यासोबत रवींद्र महाराज हरणे यांच्या नेतृत्वाखाली विशाल महाराज खोले पाटील, समाधान महाराज, नितीन महाराज, विजय महाराज, सदाशिव पाटील महाराज, लखन महाराज, दीपक महाराज, पंकज महाराज, रतिराम महाराज यांच्याबरोबर ज्ञानेश्वर पाटील हरणे आदी तरुणांची टीमही सहभागी झालेली आहे. ज्ञानेश्वर पाटील हरणे हे मुक्ताई पालखी या फेसबुक पेजच्या माध्यमातून वारीत सहभागी न होवू शकलेल्या नागरिकापर्यंत सोहळ्यातील सर्व वृत्तांत पोहचविण्याचे काम करीत आहेत.
शेंद्री ग्रामपंचायत व तालुका प्रशासनाचे नेटके नियोजन
शेंद्रीमध्ये प्रशासनाकडून जय्यत तयारी
तालुका प्रशासन व शेंद्री ग्रामपंचायत यांनी पालखी सोहळ्याचे स्वागताची जय्यत तयारी केली आहे. ग्रामपंचायतिने गावातील सर्व अतिक्रमण काढून टाकली आहेत तसेच शाळा, चावडी व समाजमंदिर याठिकाणी वारकऱ्यांच्या निवासाची सोय केली होती. आरोग्य विभागाने गावात सर्वत्र स्वच्छता करून डास प्रतिबंधक उपाय योजना केल्या आहेत. प्रशासनाने मोबाईल टॉयलेट,2 पाण्याचे टँकर, 108 ची रुग्णवाहिका, दोन प्राथमिक उपचार केंद्र डॉक्टर ची टीम अशी सोय उपलब्ध करून दिली असल्याचे तहसीलदार ऋषीकेत शेळके व उपसरपंच महेश2 चव्हाण यांनी सांगितले.
चौकट
साधुसंत येती घरा तोचि दिवाळी अन दसरा या म्हणीप्रमाणे पालखी सोहळा गावात येणे म्हणजे गावकऱ्यांच्या दृष्टीने आनंदाचा क्षण. त्यामुळे गावात आलेल्या दिंडीतील सर्व वारकऱ्यांना गावकरी उत्स्फूर्तपणे आपल्या घरी जेवायला घेऊन जातात. कित्येक जण पाऊस आला तर त्यांच्या मुक्कामाची सोय देखील आपल्या घरी करतात असे उपसरपंच महेश चव्हाण यांनी सांगितले.