कल्याण | ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याणमध्ये जाऊन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांना डिवचलं. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर कल्याणमध्ये भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. हाच धागा पकडून सुषमा अंधारे यांनी श्रीकांत शिंदे यांना सावध राहण्याचा इशारा दिला.
अनुराग ठाकूर यांची कल्याणमधील एन्ट्री श्रीकांत शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. श्रीकांत संभल जा. अभी भी टाईम है, असा सल्लाच सुषमा अंधारे यांनी दिला.
सुषमा अंधारे यांची काल कल्याणमध्ये प्रबोधन यात्रा पार पडली. यावेळी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.
सत्तेच्या स्वार्थासाठी तुम्ही तिकडे गेला. पण तुमच्या हातात सत्ता राहणार नाही. कारण भाजपने तुम्हाला फक्त सत्तेचं गाजर दाखवलं आहे. त्यामुळे आता श्रीकांत शिंदे यांच्या खबऱ्यांनी कामे चोख पार पाडावीत, असा टोला अंधारे यांनी लगावला.
गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्याकडून महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तूडवण्याचा प्रयत्न होत आहे. हा प्रकार ठरवून केला जात असून हा सुनियोजनाचा भाग असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.
गुजरातच्या निवडणुका सुरू असताना महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरित करायचे. कर्नाटकाच्या निवडणुका तोंडावर आहेत म्हटलं की महाराष्ट्रातली गावं कर्नाटकला जोडण्याचा प्रयत्न करायचा हे फार वाईट आहे. आजपर्यंत भाजप जातीजातीत भांडत लावत होती. धर्माधर्मात भांडण लावत होते. आता भाजप राज्याराज्यात भांडण लावत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे अंधारे म्हणल्या.