पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) सुधारित अंदाज हवामान विभागाने आज (ता.३१) जाहीर केला आहे. त्यानुसार देशात यंदा सर्वसाधारण म्हणजेच ९६ टक्के, तर महाराष्ट्रासह मध्य भारतात १०० टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
देशातील सुधारित पुर्वानुमानानुसार पावसाच्या अदांजात चार टक्के कमी-अधिक फरक गृहित धरण्यात आला आहे. विभागनिहाय अंदाजाचा विचार करता वायव्य भारतात ९४ टक्के, मध्य भारतात १०० टक्के, दक्षिण भारतात ९९ टक्के तर पूर्व व ईशान्य भारतात ९१ टक्के पावसाचा अंदाज आहे. यात आठ टक्के कमी-अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे.
६ जूनपर्यंत केरळात ?
दरम्यान, मॉन्सूनने गुरुवारी (ता. ३०) अरबी समुद्राच्या दक्षिण भागात असलेल्या मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागापर्यंत मजल मारली. तर बंगालच्या उपसागरावरील मॉन्सूनच्या शाखेने आणखी वाटचाल करत संपूर्ण अंदमान बेटसमूहांचा भाग व्यापला आहे. यंदा ६ जूनपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याचे पूर्वानुमान हवामान विभागाने वर्तविले आहेत.
यंदा मॉन्सूनची अंदमानातील वाटचाल काहीशी अडखळतच झाली. मॉन्सून १८ जून रोजी अंदमान बेटांच्या दक्षिणेस असलेल्या निकोबार बेटांवर दाखल झाला होता. त्यानंतर तब्बल आठ दिवसांनी वाऱ्यांनी प्रगती करत शनिवारी (ता. २५) थोडीशी चाल करत निकोबार बेटांचा संपूर्ण भाग व्यापून, उत्तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली होती. गेल्या पाच दिवसांपासून अंदमान बेटांच्या दक्षिणेत मुक्कामी असलेल्या मॉन्सूनने अखेर आज (ता. ३०) मोठी चाल केली आहे. संपूर्ण अंदमान व्यापून बंगालच्या उपसागराचा नैर्ऋत्य आणि पूर्व-मध्य भागापर्यंत मजल मारली आहे.मॉन्सून यंदा नियमित वेळेच्या पाच दिवस उशिराने दाखल होण्याचे संकेत आहेत. तर गुरुवारी (ता. ३०) वाऱ्यांनी अरबी समुद्रातील मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे वाऱ्यांच्या देवभूमीवरील आगमानबाबत उत्सुकता वाढली आहे. भारताच्या दक्षिणेकडे असलेल्या समुद्रावर ढगांनी दाटी करण्यास सुरवात केली आहे.