प्रियंका गांधीना उत्तरप्रदेश पोलिसांनी पुनः एकदा घेतले ताब्यात –

प्रियंका गांधीना  उत्तरप्रदेश पोलिसांनी पुनः एकदा घेतले ताब्यात –

लखनौ : उत्तरप्रदेशमधील आग्रा येथील जगदीशपूर भागात पोलीस कोठडीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र, आता यानंतर येथील राजकारण तापायला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. या व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आग्र्याकडे  निघालेल्या काँग्रेस (Congress) सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस-वेवर रोखले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे यमुना एक्स्प्रेस-वेच्या एंट्री पॉइंटवर पोलीस व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीदेखील झाल्याचे समोर आले.

जगदीशपूरमध्ये सफाई कर्मचारी अरुण वाल्मीकी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणी पाच पोलिसांवर कारवाई करत त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर या मृत अरुणच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी निघाले असताना यमुना एक्सप्रेस-वेच्या एंट्री पॉइंटवर पोलिसांनी प्रियंका यांचा ताफा अडवला. त्यानंतर पोलिसांनी प्रियंका यांना ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पोलीस व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी सुरू झाल्याने, वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी पोलिसांकडून कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी या घटनेच्या निषेधार्थ ट्विट केले आहे. “एखाद्याला पोलीस कोठडीत मारहाण करून ठार करणे, हा कुठला न्याय आहे? आग्रा पोलीस कोठडीत अरुण वाल्मीकीच्या मृत्यूची घटना निंदनीय आहे. भगवान वाल्मीकी यांच्या जयंतीच्या दिवशी उत्तरप्रदेश सरकारने त्यांच्या संदेशाविरोधात काम केले आहे. उच्चस्तरीय चौकशी व पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे आणि पीडित कुटुंबास भरपाई दिली जावी.” असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

तसेच, या प्रसंगी माध्यमांना प्रतिक्रिया देताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, “ते म्हणातात मी आग्रा येथे जाऊ शकत नाही. मी तिकडे गेल्यास मला रोखतात. मी एका रेस्टॉरंटमध्ये बसून राहावे का? केवळ ते त्यांच्या राजकारणासाठी सोयीचे ठरेल म्हणून… मला त्या कुटुंबीयांची भेट घ्यायची आहे.”

ग्लोबल न्युज नेटवर्क: