पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं ‘हे’ आवाहन

पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं ‘हे’ आवाहन

मुंबईः कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषणेनुसार आज रात्रीपासून 21 दिवसांसाठी देशभरात लॉकडाऊन असणार आहे. मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.  जीवनावश्यक सोयी-सुविधा सुरुच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेला केलं. 

कोरोना व्हायरस या संकटाचं गांभीर्य ओळखून लोकांनी सहकार्य करावं, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.  संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे,  असा धीर देत नागरिकांनी  घरातच राहा, सुरक्षित राहा, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. अन्नधान्याचा साठा पुरेसा; काळजीचे कारण नाही. सरकारची संपूर्ण यंत्रणा दक्ष झाली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले जे नियम आहेत ते तसेच राहतील. जीवनावश्यक सोयी आणि सुविधा सुरूच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये, असंही ट्विटही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

गैरसमज करुन घेऊन नका. युरोपीय देशांसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये त्यामुळे आपण अत्यंत महत्त्वाची पाऊलं उचलत आहोत. आपल्या मनातील भीती दूर करा. कोणत्याही परिस्थितीत जीवनाश्यक वस्तू, सेवा पुरवणाऱ्या सुविधा सुरु राहतील, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

औषधे, औषधे बनवणाऱ्या कंपन्या, कर्मचारी वर्ग, जीवनाश्मक सुविधा पुरवणारा महापालिकेचा कर्मचारी वर्ग, अग्निशमक दल, पोलीस, सर्व रुग्णालयाचा कर्मचारी वर्ग, दुधाच्या गाड्या, भाजीपाला, अन्नधान्याच्या वाहतूक करणाऱ्या गाड्या यापैकी काहीही बंद होणार नाही. त्यामुळे काळजी करु नका. या सेवा कधीही बंद होणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, संकट मोठं आहे.  या संकटाचा संधी म्हणून कोणी उपयोग करु नये. यासाठी सर्वांनी समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. संकट काळात रक्ताचा तुटवळा पडू शकतो.  लालबागच्या राजा गणपती मंडळाने रक्तदान शिबीरं सुरू  केली आहेत, त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: