पार्थ आराध्ये
मुंबई – पंढरपूर चे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी आज मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी बराच वेळ एकांतात चर्चा केल्याने राजकीय क्षेत्रात विविध अंदाज बांधले जात आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे संदर्भ बदलत असल्याचे चित्र आहे. आमदार भारत भालके हे मंगळवारी मुंबईत मंत्रालयात गेले असता अनेक नेत्यांची गर्दी असताना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भालके यांना बाजूला घेत त्यांच्याशी एकांतात चर्चा केली. किमान अर्धा तास ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात काँगे्रसची ताकद ज्या मोजक्या भागात लोकसभेला दिसून आली यात भालके यांच्या पंढरपूर- मंगळेवढ्याचा समावेश आहे.
सध्या आघाडीमधील काही आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाचा व आमदारकीचा राजीनामा देत भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. विखे पाटील व भालके यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. विखे यांनी घेतलेल्या बैठकीला ही भालके हजर होते, नंतर भालके व फडणवीस यांच्या आजच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
या भेटीचा तपशील समजू शकला नसला तरी मुख्यमंत्र्यांच्या दालनातून बाहेर पडलेल्या आमदार भारत भालके यांच्या चेहर्यावरील हास्य बरेच काही सांगून जात असल्याचे तेथे उपस्थित असलेल्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात ज्या प्रमाणे लोकसभेला यश मिळाले आहे त्याप्रमाणेच विधानसभेला मिळावे अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा असून यासाठी भाजपाची जोरदार तयारी सुरू आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ व पंढरपूर या दोनच मतदारसंघात काँगे्रस व राष्ट्रवादीला मताधिक्क्य आहे. यामुळे आता तेथील ताकदवान नेत्यांना विधानसभेला गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भालके व मुख्यमंत्र्याची भेट झाल्यानंतर अनेक चर्चा रंगत असून विखे पाटील यांच्या समवेत त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता ही काही जण वर्तवित आहेत.