अंतिम परीक्षा रद्द करा,महाविद्यालयीन विदयार्थ्यांची सोशल मीडियावर मागणी
लॉकडाऊन काळात शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यातच शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी परीक्षा बाबत धोरणात्मक निर्णय घेऊन विध्यार्थी आणि पालक वर्गाला दिलासा दिला होता मात्र पदवीच्या परीक्षांबाबत उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घोषणा केली होती. केवळ पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा होणार आहे. जुलै महिन्यात अंतिम वर्षाची, अंतिम सत्राचीच परीक्षा होणार आहे. मात्र आता या निर्णयाचा विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी विरोध केला असून, परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी ऑनलाईन मोहीम उघडली आहे.
मंत्री सामंत यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या नाराज विद्यार्थ्यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली आहे. याचिका इंटरनेटवर फिरत असून, आतापर्यंत 34,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्याच समर्थन केले आहे.
याचिकेत असे लिहिले आहे की, आपल्या सर्वांना माहितच आहे की, नुकतेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले की अंतिम सेमेस्टर विद्यार्थ्यांना पदवी मिळविण्यासाठी परीक्षा द्यावीच लागेल. मात्र सध्या अनागोंदी आणि गोंधळाचे वातावरण आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी ज्या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या नाहीत त्यांची यादी देखील यात नमूद केली आहे. यामध्ये सामाजिक अंतराचे नियम, विद्यार्थ्यांचा ताण, अभ्यास सामग्रीची अनुपलब्धता आणि परीक्षा केंद्रांमध्ये प्रवास यासह इतर गोष्टींचा समावेश आहे.